नमस्कार, मी श्री.विशाल पोतदार, सहा.शिक्षक, माध्यमिक विद्यालय चाफोडी, ता.करवीर, जि.कोल्हापूर (मोबा.9765159192) आपलं या ब्लॉगवर मनःपूर्वक स्वागत करतो...

Tuesday, October 22, 2019

राष्ट्रीय गणित दिवस

महान गणितज्ञ एस.रामानुजन

            एकदा एका वर्गात शिक्षक मुलांना गणित शिकवत होते." कोणत्याही संख्येला त्याच संख्येने भागले असता भागाकार एक येतो. उदाहरणार्थ 2 ला 2 ने भागलं तर भागाकार एक येतो ."   वगैरे .

      शिक्षकाचं बोलणं संपताच समोरच्या बाकावर बसलेल्या एका मुलांना हात वर करून त्यांना प्रश्न विचारला, "  सर शून्याला शून्याने भागले तर भागाकार एकच येईल का?" मुलाच्या त्या प्रश्नांला काय उत्तर द्यावं तेच त्या शिक्षकाला  कळेना. शेवटी त्या शिक्षकाने त्या मुलाला गप्प बसवलं.

         प्रश्न विचारणारा मुलगा होता श्रीनिवास रामानुजन. भारतातीलच नव्हे तर जगातला एक महान गणितज्ञ. गणिताच्या क्षेत्रात रामानुजन यांची तुलना न्यूटन ,ऑयलर आणि याकोबी यासारख्या गणितज्ञाबरोबर केली जाते.   

          जगातील महान गणिती मधील एक अग्रगण्य  म्हणून श्रीनिवास रामानुजन यांचा उल्लेख केला जातो. "कुठलेही आकडे निस्तेज नसतात ,त्यांच्यातील चैतन्य जाणवलं तर गणितातल्या अनेकानेक समस्या चुटकीसरशी सुटू शकतात ." यावर विश्वास ठेवून

स्वप्रयत्नांच्या जोरावर रामानुजन यांनी गणितातले 4000 सूत्र नव्याने मांडली व सिद्धही करून दाखवली. प्राईम नंबर,थीटा  फंक्शन, इनफिनाईट सिरीज हे गणितातले आवडीचे विषय हाताळत. 

             श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म 22 डिसेंबर 1987 रोजी तंजावर जिल्ह्यातल्या एरोड गावी झाला. त्यांचे वडील श्रीनिवास अयंगार कुंभकोणमच्या एका कापडाच्या व्यापाऱ्याकडे नोकरी करत असत .त्यांच्या हातात महिन्याला वीस रुपये पडत. ते स्वभावाने अतिशय सरळ आणि साधे होते .रामानुज यांच्या आईचे नाव कोमलम्मा असे होते. त्या खूपच धार्मिक होत्या.

         शाळेत असतानाच त्यांच्या असामान्य प्रतिभेची लक्षणे दिसायला लागली होती. अनेक अतिशय अवघड अशी गणिती प्रमेय ते स्वतः सोडवत असत. रामानुजन गणितात नेहमीच शंभर पैकी शंभर गुण मिळवत परंतु इतर विषयांमध्ये मात्र त्याला मुळीच आवड नव्हती . त्यामुळे ते कॉलेजमध्ये चार वेळेस नापास झाले. शेवटी एकदाची पदवी हातात पडली .

             22व्या वर्षी त्यांचा विवाह नऊ वर्षे वयाच्या जानकी नावाच्या मुलीशी झाला. 1910 मध्ये नोकरीच्या शोधात रामानुजन मद्रासला आले मद्रास पोर्ट ट्रस्टमध्ये त्यांना महिना पंचवीस रुपये पगारावर आकडेमोडीचे काम मिळालं. तिथे काम करत असताना त्यांनी तेविसाव्या वर्षी गणित विषयांमध्ये स्वतःचा पहिला शोधनिबंध लिहिला तो " जर्नल ऑफ द इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटी " या नियतकालिकात प्रकाशित झाला.

      16 जानेवारी 1913 रोजी केवळ मित्रांच्या आग्रहामुळे रामानुजन यांनी ट्रिनिटी कॉलेजमधील प्रो. गाॅडफ्री हार्डी यांना त्यांचं गणितावरील संशोधनकार्य पाठवून दिलं. ते पाहून प्रो. हार्डी प्रभावित झाले. रामानुजन यांना त्यांनी केंब्रिजला बोलावून घेतलं .

  केंब्रिज व मद्रास विद्यापीठाने दिलेल्या आर्थिक सहाय्याच्या आधारे 17 मार्च 1914 रोजी श्रीनिवास रामानुजन यांनी इंग्लंड कडे प्रयाण केलं.

          केंब्रिज विद्यापीठातील सुखसोयी तसंच प्रो. हार्डी आणि प्रो. लिटलवूड यांचं मार्गदर्शन लाभल्याने यांची चांगली प्रगती झाली. इंग्लंडमधील पाच वर्षांच्या कालावधीत त्यांचे 21 शोधनिबंध दर्जेदार नियतकालिकांमध्ये प्रकाशित झाले. इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीच्या जनरल  मध्येही त्यांचे 12 शोधनिबंध प्रसिद्ध झाले. त्यांनी संख्यासिद्धांतात केलेलं कार्य भौतिक शास्त्र आणि संगणक विज्ञानातील अवघड समस्या सोडविण्यासाठी उपयुक्त असल्याचे नंतर लक्षात आलं. 1918 साली रामानुजन FRS बनले म्हणजे  "फेलो ऑफ द रॉयल "सोसायटी.या सोसायटीच्या इतिहासातले ते सर्वात तरुण फेलो होते. शिवाय "फेलो ऑफ ट्रिनिटी " होणारे ते पहिले भारतीय होते .हे दोन्ही सन्मान अतिशय मानाची आहेत ही बाब लक्षात घेतली पाहिजे.

    " हार्डी -रामानुजन -लिटल वूड- सर्कल मेथड इन नंबर थेअरी " किंवा "रॉजर -रामानुजन आयडेंटिटीज इन पार्टिशन इंटिजर्स" हे गणितातील विभाग आता पक्के रुजले आहेत. गणितातील रामानुजन यांचे जादूचे चौरस (MAGIC SQUARES) अफलातून आहेत त्यांच्या जन्मदिनांकाचा त्यांनी बनवलेला चौरस फोटोमध्ये दिलेला आहे.

     इंग्लंडला असताना रामानुजन आजारी पडले. 27 फेब्रुवारी 1929 रोजी चेन्नईला परतले . रामानुजन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते तेव्हा हा हार्डी त्यांना भेटायला आले तेव्हाचा एक किस्सा एका विशिष्ट संख्येला प्रसिद्धी देऊन गेलेला आहे. ती संख्या आहे 1729. ही अशी लहानात लहान संख्या आहे जी दोन संख्यांच्या घनांच्या स्वरूपात लिहिता येते. 10 चा घन अधिक 9 चा घन. तसेच 12 चा घन अधिक 1 चा घन .

    वैद्यकीय प्रयत्न चालू होते पण नियतीने पूर्ण फूल उमलायच याआधीच खुडलं होतं. 26 एप्रिल 1920 रोजी रामानुजन यांनी जगाचा निरोप घेतला पण जाताना गणितातील 4000 सूत्र त्यांनी मागे ठेवली. श्रीनिवास रामानुजन यांना फक्त बत्तीस वर्षांचा आयुष्य लाभलं . शेवटच्यावर्षी त्यांनी केलेल्या संशोधनाचा आवाका एवढा व्यापक होता की एखाद्या मान्यवर गणितज्ञाला त्यासाठी सारं आयुष्य खर्ची पाडावं लागेल.

                त्यांच्या पश्चात प्रो. हार्डी , अय्यर आणि विल्सन यांनी त्यांचे शोधनिबंध एकत्र करून प्रसिद्ध केले. चारशे पांनांच संशोधन छापून प्रसिद्ध झालं. हजारो पानं तशीच पडून होती पण त्यांचाही यथावकाश पुस्तकांमध्ये समावेश करण्यात आला. त्यांच्या संशोधनावर प्रोफेसर हार्डी यांनी जी व्याख्याने दिली त्यांचा संग्रह केंब्रिज विद्यापीठाने प्रकाशित केला .रामानुजन देखील एक चांगले वक्ते होते त्यांचं " गाॅड, झिरो अंड इंफिनिटी " हे भाषण जगभर गाजलं होतं . टाइम्स या जगप्रसिद्ध साप्ताहिकातर्फे गेल्या शंभर वर्षांमधील तत्त्वचिंतकांची त्यांची एक सुची 1999 तयार करण्यात आली होती. त्यामध्ये भारतातील रामानुजन यांचे नाव समाविष्ट करण्यात आलं होतं.

            भारत सरकारने 22 डिसेंबरला राष्ट्रीय गणित दिन( "NATIONAL MATHEMATICS DAY ")म्हणून घोषित केले. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी २ फेब्रुवारी २०१२ रोजी मद्रास विद्यापीठात भारतीय गणितातील अलौकिक बुद्धिमत्ता श्रीनिवास रामानुजन् यांच्या 125 व्या जयंतीदिनानिमित्त आयोजित सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी ही घोषणा केली.





No comments:

Post a Comment